प्रासंगिक लेख:- ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन
“रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा”
“आरोग्यासाठी एकत्र विज्ञानाच्या पाठीशी उभे राहूया”
“सरकारी दवाखाण्यात मोफत उपचार पण खासगी रुग्णालयातील दरपत्रकच काय?”
“मानवाला मिळालेला देह ही ईश्वराची देणगी आहे. अर्थात त्याचा उपयोग चांगल्या कारणांसाठी व्हायला हवा. माणसाचे हात आहेत ते दुसऱ्याला मारण्यासाठी नाही, तर दुसऱ्याची सेवा करण्यासाठी. माणसाला हृदय, मन दिले आहे, ते दुसऱ्यावर प्रेम करण्यासाठी, पण माणूस प्रेम करण्याचे हृदयाचे काम विसरून गेला आणि एकमेकात हेवे-दावे, भांडण-तंटे निर्माण झाले. प्रेम दुर्मिळ होऊ लागले. मनसे जर एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने वागू लागली, तर जगात सर्वत्र शांतता, प्रेमभाव निर्माण होईल”, असे मदर तेरेसा यांनी माणसाचे शरीर ईश्वराने कशासाठी दिले हे उत्कृष्टरित्या समजावून सांगतांना `म्हटले आहे
जागतिक आरोग्य दिन २०२६ ची संकल्पना “आरोग्यासाठी एकत्र. विज्ञानाच्या पाठीशी उभे राहूया” ही आहे . जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ही संकल्पना मानव, प्राणी, वनस्पती आणि परिसंस्थांवर परिणाम करणाऱ्या तातडीच्या आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विज्ञानाच्या पाठीशी उभे राहण्याचे आणि सहकार्य अधिक दृढ करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. ही संकल्पना एक स्पष्ट संदेश देते की, अधिक आरोग्यदायी आणि सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी विज्ञान-आधारित भागीदारी अत्यावश्यक आहे. ती विज्ञानावरील सार्वजनिक विश्वासाला आणि आरोग्य व हवामानाशी संबंधित निर्णयांमध्ये पुराव्यांच्या अधिक प्रभावी वापराला प्रोत्साहन देते. २०२६ ची मोहीम हे मान्य करते की आजचे अनेक मोठे आरोग्य धोके एकमेकांशी जोडलेले आहेत आणि ते केवळ एकाच क्षेत्राद्वारे सोडवले जाऊ शकत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेचा संदेश आहे की सध्याच्या आणि भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक पुरावे, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि ‘ वन हेल्थ’ मॉडेल अत्यावश्यक आहेत. या वर्षी ‘ वन हेल्थ’ दृष्टिकोन विशेष महत्त्वाचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार, हा एक एकात्मिक आणि एकसंध दृष्टिकोन आहे, जो मानवी आरोग्य, पशु आरोग्य, वनस्पती आरोग्य आणि व्यापक पर्यावरण यांच्यातील घनिष्ठ संबंधांना मान्यता देतो. जागतिक आरोग्य दिन २०२६ महत्त्वाचा आहे, कारण तो यावर जोर देतो की आरोग्य सुरक्षा केवळ रुग्णालये आणि औषधांवर अवलंबून नाही. ती विश्वसनीय विज्ञान, लवचिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील व सीमापार सहकार्यावर अवलंबून आहे.

जीवन जगत असतांना माणसाने आपले आरोग्य जपायला हवे कारण माणसाचे जन्म आणि मृत्यू याच्या मधला दुवा हे माणसाचे आरोग्य आहे. आपले आरोग्य चांगले असेल, तर आपल्याला कोणत्याच रोगाचा, आजाराचा सामना करण्याची गरज भासणार नाही. परंतु आपले आरोग्य जर चांगले नसेल, तर असंख्य रोगांनी, आजारांनी आपल्यावर हल्ला होईल आणि आपण लवकरच मृत्युशय्येवर विराजमान होऊ यात तिळमात्र शंका नाही. चांगले आरोग्य हे सुखी आणि समृध्द जीवनाचे खरे मंत्र आहे. म्हणून जीवन जगत असतांना माणसाने आपल्या आरोग्याची निगा काळजीपूर्वक राखणे गरजेचे आहे. लहानपणापासून आपल्याला खर तर आपल्या आरोग्याची निगा राखण्यासाठी शारीरिक शिक्षण दिले जाते. चांगले आरोग्य लाभावे असे जीवन जगत असलेल्या प्रत्येक माणसाला वाटत असते.

अचानक आरोग्याची एखादी समस्या निर्माण झाली, जखम झाली, शरीराच्या एखाद्या भागाला वेदना सुरु झाली, सर्दी, खोकला ताप तसेच डोकेदुखी अशी कोणतीही परिस्थिती आरोग्याबाबत उदभवली की, लगेच आपण डॉक्टरांच्या शोधात दवाखाना अर्थात रुग्णालय गाठतो. याचेच संदर्भ घेवून आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून शासनाने वेगळे विभाग स्थापन केले, ते म्हणजे आरोग्य विभाग. आरोग्य विभागात असलेल्या डॉक्टरांच्या कमतरतेमुळे, उपलब्ध नसलेल्या शस्त्रक्रियेची साधने तसेच तज्ञांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना खाजगी रुग्णालय गाठावे लागते. खाजगी रुग्णालयात अनेकदा रुग्णांकडून मनमानी शुल्क आकारले जाते. रुग्णाला याची कल्पना असते की, येथे आपली लुट होत आहे तरी रुग्ण मजबुरीत ते शुल्क देण्यासा तयार असतात. सगळेच खाजगी रुग्णालय असे मनमानी रुग्ण शुल्क आकरतात असे नाही. अनेक रुग्णालय असे आहेत ज्या रुग्णालयांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
आरोग्य सेवा देणाऱ्यामध्ये माणुसकी नसली म्हणजे सार निरर्थक ठरते. आरोग्य सेवा अर्थात रुग्णसेवा करीत असतांना खऱ्या अर्थाने माणुसकीची भाषा जो जाणतो तो खर साधू असे म्हणायला हरकत नाही. रुग्णसेवा करीत असतांना रुग्णसेवा देणाऱ्यानी स्वतःला भाग्यवानच समजावे कारण आपल्या हातून समाजातील अपंग, दीन, दलित, शोषितांची सेवा होत आहे. मनुष्य जन्मास आल्यावर त्याला आयुष्यात चार कर्तव्य पार पदवी लागतात. कौटुंबिक. सामाजिक, राजकीय व धार्मिक ही चार कर्तव्य होत. त्यालाच आपण धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष म्हणतो. आरोग्य सेवेत अर्थात रुग्णसेवेत काम करित असतांना पहिले कर्तव्य धर्म पाळत असतांना माणुसकीचा धर्म पाळणे गरजेचे आहे. दुसरे कर्तव्य अर्थ पाळत असतांना हे नेहमी लक्षात ठेवावे कि, जीवन जगात असतांना पैसा तर सर्वच क्षेत्रातील लोक कमवितात परंतु आरोग्य सेवेत काम करीत असतांना पैश्यासोबत आपल्याला लोकांची सेवा, जनसेवा करण्याचे मोलाचे कार्य आपल्या हातून होत आहे. खर तर आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांना जनसेवा करण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नसते. बाकी क्षेत्रात काम करणाऱ्यांना तरी जनसेवा करण्यासाठी इतरत्र जावे लागते, वेळ काढावा लागतो. तिसरे कर्तव्य काम पाळत असतांना खर तर आरोग्य सेवेत काम करीत असतांना आपल्याकडून १००% रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न आरोग्य सेवेतील लोकांनी करायला हवा. बाकी सगळे ईश्वराच्या हाती आहे. चांगल्या कामाची किंमत एक दिवस चांगलीच मिळते. चौथे कर्तव्य मोक्ष पाळत असतांना खर तर आपण जीवनात केलेल्या चांगल्या वाईट कामांच्या मोबदल्यात शेवटी आपल्याला मोक्ष प्राप्त होईलच यात तिळमात्र शंका नाही. माणूस हा समाजापेक्षा कधीही मोठा नसतो. समाजाचे आपल्यावर मोठे उपकार असतात. त्याची परतफेड करणे आपली जबाबदारी आहे. म्हणून समाजासाठी माणसाने थोडा तरी त्याग केला पाहिजे. आज ज्याच्या पुढे आदरयुक्त भावनेने नतमस्तक व्हावे अशी माणसे समाजात दुर्मिळ झाली आहेत.
समाजात जिकडे तिकडे देसतो तो घृणा आणणारा स्वार्थ. जो तो स्वार्थ साधण्यासाठी जणू संधीची वाटच पाहत असतो आणि वरवर समाजसेवेचा आव आणतो. समाजातील अपंग, दीन, दलित, शोषित आणि गरीब तळागाळातील लोकांसाठी असलेल्या सोयी सवलती त्यांच्या पात्रातून आपल्या पात्रात ओढणारे महाभाग पहिले की, मन उदास होते.
खर तर काही लोकांनी वैद्यकीय सेवेला, आरोग्य सेवेला पूर्णपणे व्यावसायिक करून टाकले आहे. काही वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी रुग्णांना आपले ग्राहक मानतात याची प्रचिती आपल्याला समाजात वावरत असतांना होतेच. फारच क्वचित लोक आहेत जे रुग्णांना ईश्वर मानतात त्यांची सेवा करतात. रुग्णसेवा करा फुकट करू नका, परंतु खाटकासारखा सुरा तरी लावू नका.
आचार्य श्रीमद विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज आपल्या प्रवचनात म्हणतात कि, “डॉक्टरांनी रुग्णाला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. त्याला नाहक वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगून खर्चात पाडू नये. रुग्ण वाचण्याची जेथे शक्यता नसेल तेथे उपचार न करता रुग्णाला सुट्टी द्यावी. तसेच वेगवेगळ्या प्रकारची निरर्थक व बनावट औषधे बाजारात येत आहेत. त्या औषधाला प्रतिबंध घालणे डॉक्टरांच्या हाती आहे. त्यांनी प्रामाणिकपणे हे काम करावे व रुग्णांचे शोषण करणारी जी व्यवस्था निर्माण झाली आहे ती बदलण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा.”
खासगी रुग्णालयात द क्लिनीकल आस्थापना कायदा २०१० आणि द क्लिनीकल आस्थापना नियमा २०१२ लागू करण्याबाबतचे आदेश काढावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे. या कायद्यानुसार प्रत्येक खासगी रुग्णालयात मिळत असलेल्या सेवांचे दरपत्रक दर्शनी भागात इंग्रजी व प्रादेशिक भाषेत लावणे बंधनकारक आहे. प्रत्येक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकाला याबाबत पूर्वमाहिती मिळेल. शासकीय यंत्रणेकडून याबाबत प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. महाराष्ट्रातील बहुतांश हॉस्पिटलध्ये हा कायदा पाळला जात नाही. एकीकडे सराकरी दवाखान्यात मोफत उपचार सुरु होणार आहे पण खासगी रुग्णालयातील दरपत्रकच कधी लागणार असा सवाल महाराष्ट्रातील गोर गरीब नागरिकांना पड़त आहे?
खर तर सुखी जीवन जगण्याचा एकमेव महामंत्र म्हणजे चांगले, उत्तम आरोग्य. संपूर्ण राज्यात लवकर क्लीनिकल इस्टेब्लिशमेंट ऍक्ट लागू व्हावा एवढीच अपेक्षा!
-नितीन प्रतापसिंह श्रीवास्तव
प्रतापगढ,शिवशंकर नगर
बुलडाणा,मो.नं.९४२१४९४०४०










